‘विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे’ या मराठी विज्ञान परिषदेच्या मूळ उद्देशाला अनुसरून १९६७ सालापासून विज्ञान निबंध स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी १९८७ सालापासून विद्यार्थी गट (इयत्ता बारावी पर्यंत) आणि खुला गट (पदवीचे विद्यार्थी व इतर सर्व प्रोढ) असे दोन गट करण्यात आले. आलेल्या निबंधांचे परीक्षण आधी भौगोलिक विभागीय पातळीवर तर नंतर राज्यपातळीवर केले जाते. या वर्षी विद्यार्थी गटासाठी – मोबाइलपासून मैदानाकडे तर खुल्या गटासाठी – देहदान व अवयवदान असे विषय ठरवण्यात आले आहेत.
विद्यार्थी गट (इयत्ता बारावीपर्यंत)
मोबाइलपासून मैदानाकडे : आज मोबाइलचा वापर सर्वत्र होत आहे. किंबहुना कोरोना साथीपासून शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाइल असण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. मोबाइलचे रोजच्या जीवनात नानाविध उपयोग आहेत, ह्याबाबत कोणाचेच दुमत नसेल. पण मोबाइलचा अतिवापर व्हायला लागला आहे, याविषयी पण सगळे सहमत असाल याबाबत शंका नाही. ‘अति तिथे माती’ या उक्तीप्रमाणे अति मोबाइल वापराचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. त्यात डोळ्यांचे विकार, पाठीचे / मानेचे दुखणे, निद्रानाशाची समस्या इत्यादी अनेक त्रास होत आहेत. तसेच मोबाइलबरोबर घालवत असलेल्या अति वेळामुळे शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे, मोबाइलवरील खेळात गुंग राहात मैदानी खेळाकडे कोणी फिरकतच नाही असे चित्र सर्वत्र बघायला मिळते आहे. यामुळे लठ्ठपणा व तत्सम शारीरिक दोष वाढीला लागलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर जागरूकता करून मोबाइलचा वापर सीमित करत व्यायाम करणे, मैदानी खेळ खेळणे याचा समतोल साधत पुढे जायला हवे. त्या अनुषंगाने विचार या निबंधात मांडणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत याचे दोष, त्याचे होत असलेले दुष्परिणाम आणि अपेक्षित सुधारणा वा उपाय याविषयीची चर्चा निबंधात अपेक्षित आहे.
खुला गट (पदवीचे विद्यार्थी व इतर सर्व प्रोढ)
देहदान आणि अवयवदान : भारतात दरवर्षी लाखो लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते, पण दान करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (NOTTO) सरकारमार्फत जनजागृती आणि व्यवस्थापनाचे कार्य करते. भारताचा अवयव दान दर (ऑर्गन डोनेशन रेट) अद्यापही विकसित देशांपेक्षा खूपच कमी आहे. आपल्या देशात १० लाख लोकांमागे सुमारे ०.५ ते १ अवयव दाते आहेत तर स्पेनसारख्या देशांमध्ये हा दर ४०च्या आसपास आहे. यामागे अंधश्रद्धा, माहितीचा, जनजागृतीचा आणि लोकशिक्षणाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. अवयव दान केव्हा करता येते, याबद्दल बहुतेक लोक अनभिज्ञ असतात. ब्रेन डेथ म्हणजे नक्की काय? निबंधामध्ये ही गोष्ट नीट समजावून सांगणे अपेक्षित आहे. अवयवदानाच्या माध्यमातून एक व्यक्ती असाध्य रोगांच्या आठ रुग्णांना जीवनदान देऊ शकते हे आवर्जून सांगणे गरजेचे आहे. ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ अशी भावनिक हाक घालून लोकांना अवयवदानाची नोंदणी करायला कसे प्रवृत्त करता येईल याविषयी काही कल्पक उपाययोजनेचा अंतर्भाव निबंधात आल्यास उत्तम. देहदान / अवयवदान नोंदणी करणे वा इच्छापत्र करणे या सोयीबद्दल माहिती निबंधात यावी.
(सूचना : छायाचित्रे, कात्रणे इत्यादींचा अंतर्भाव निबंधात करू नये.)
तिन्ही स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.
दूरध्वनी : (०२२) – ४८२६३७५० / ४८२६००९४ भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१
इ-मेल : officer1.admin@mavipa.org
स्पर्धेचे नियम – सुचना, विभाग रचना व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.